चर्मकार महामंडळातील भरपूर पदे रिक्त, नवीन पदभरती जाहिरात बद्दल अपडेट – Charmakar Mandal Bharti
Charmakar Mandal Bharti – चर्मकार समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना देश-परदेशातील शिक्षणासाठी, स्वंयरोजगारासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ स्थापन झाले. त्यासाठी मंजूर ९५ पदांपैकी तब्बल ९० पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ ५ स्थायी कर्मचारी शिल्लक आहेत. महामंडळाचा सारा कार्यभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आहे. महामंडळातर्फे बीज भांडवल योजना, महिला समृद्धी योजना, मुदत कर्ज योजना, बीज भांडवल योजना राबविण्यात येतात. बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी बीज भांडवल योजना आणि पन्नास टक्के अनुदान योजना राबविण्याची योजना सुरू आहे. परंतु बँकेत खेटा घातल्यानंतरही कर्ज प्रकरणे मंजूर होत नाही. दमछाक झाल्याने नकोरे बाबा कर्ज, अशी अर्जदाराची मानसिकता तयार होते. महामंडळाने थेट कर्ज योजना आणि महिला समृद्धी योजनेचे उद्दीष्ट न गाठल्यामुळे थंडबस्त्यात गेली. कर्मचारीच नसल्यामुळे आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतरही महामंडळाकडून एकही कर्ज प्रकरण झाले नाही.
कंत्राटींना आरोग्य विभागाचा नियम
या महामंडळाचे मुंबईत मुख्य पद व्यवस्थापकीय संचालक. चर्मकार महामंडळाच्या व्यवस्थापक प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. यानंतर राज्यभरात लातूर, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण आणि नागपूर या सर्व विभागीय कार्यालयातील प्रादेशिक व्यवस्थापक प्रभारावर आहेत. ३० जिल्ह्यांमध्ये जिल्हा व्यवस्थापकाची पदे आहेत. परंतु सर्वच जिल्हा व्यवस्थापक निवृत्त झाले. यानंतर कायम पदे भरण्यात आली नाही. ज्या पद्धतीने शासनाच्या आरोग्य विभागात NRHM या योजनेत कंत्राटी असलेल्या कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात येत आहे. तोच नियम महामंडळात लावण्यात यावा. कंत्राटींना स्थायी करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
२ लेखापाल, ३ वसुली निरीक्षक
प्रभार सांभाळणारे प्रादेशिक व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक यांचा शासनाने जणू छळ मांडला आहे. यांना सातव्या वेतन आयोगानुसार अतिरिक्त मोबदला देण्याची गरज आहे. परंतु केवळ पाच सहाशे रुपये देऊन यांची बोळवण केली जाते. तर सध्या ९० पैकी ५ कायम कर्मचारी महामंडळात शिल्लक असून यात २ लेखापाल तर ३ वसुली निरीक्षक आहेत. नुकतेच वसुली निरीक्षक पदावरून ३० जून २०२६ रोजी राजेंद्र तुकाराम जीभकाटे निवृत्त झाले. निवृत्त होताना कर्मचाऱ्याने केलेल्या सेवेसंदर्भातील पत्र देखील मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.